हवामान खात्याचा अंदाज पुढील 48 तास धोक्याचे!
हवामान खात्याचा अंदाज पुढील 48 तास धोक्याचे!
नागरिकांनी सतर्क रहावे.
बीड (प्रतिनिधी) :-
गेल्या दोन आठवड्या पासून पावसाने चांगलाच जोर धरल्याचे दिसत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 48 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाने हैराण झालेल्या नागरिकांना या वर्षी ओल्या दुष्काळाला तोंड द्यावे लागते की काय अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे यंदाचे २०२० हे वर्ष मानवी आयुष्यासाठी हानिकारक असल्याचे दिसून येत आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्याने जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.
राज्यात मध्य महाराष्ट्र, घाट माथा तसंच तळ कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोयना, राधानगरी परिसरात सुरू असलेला पाऊस आणखी दोन दिवस असाच सुरू राहिल अशी माहिती आयएमडीने दिली आहे. तर पुण्यातही घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
21 तारखेपर्यंत कोकण-मध्य महाराष्ट्रात तुफान पाऊस असणार आहे तर 25 तारखेपर्यंत महाराष्ट्रात उत्तम पाऊस होईल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. मराठवाड्यातही काही भागात पावसाचा जोर असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाचा ऑगस्टमध्ये मात्र जोरदार वर्षाव सुरू आहे.
गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उजनीचा अपवाद वगळता बहुतांश धरणं 75 टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा